महागाईच्या झळा; पंधराशे रुपयांत संसार कसा? निराधारांचा टाहो

महागाई

संजय गांधी निराधार वृद्ध पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा मिळणारी पंधराशे रुपयांची मदत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अपुरी ठरत असल्याची भावना निराधार वृद्धांकडून व्यक्त होत आहे. वीज बिल, गॅस सिलेंडर, औषधे, मोबाईल रिचार्ज आणि दैनंदिन अन्नखर्च भागवताना या रकमेवर महिनाभर संसार चालवणे कठीण होत असल्याची व्यथा लाभार्थ्यांनी मांडली आहे.

वृद्धांचे म्हणणे आहे की, महिन्याचे वीज बिलच अनेकदा ३०० ते ५०० रुपयांपर्यंत जाते. गॅस सिलेंडरचा दर हजार रुपयांच्या आसपास पोहोचल्याने तो भरल्यानंतर इतर आवश्यक खर्चासाठी पैसे उरत नाहीत. वयोमानामुळे औषधांचा नियमित खर्च करावा लागतो, ज्यासाठी दरमहा काहीशे रुपये लागतात. संपर्कासाठी मोबाईल आवश्यक असल्याने त्याचा खर्चही टाळता येत नाही. परिणामी उरलेल्या रकमेवर अन्नखर्च भागवणे मोठे आव्हान ठरत आहे.

निराधार लाभार्थ्यांनी शासनाकडे पेन्शन रकमेचा पुनर्विचार करून ती वाढवण्याची मागणी केली आहे. “मिळणारी मदत ही प्रत्यक्ष जीवन जगण्यासाठी पुरेशी असावी. वाढत्या महागाईचा विचार करून शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related News

लाभार्थी उमाबाई गवळी म्हणाल्या, “आता शरीराने कोणतेच काम होत नाही आणि उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. सरकारकडून मिळणारे पंधराशे रुपये महिन्याच्या सुरुवातीलाच संपतात. वीज बिल, औषधे आणि गॅस भरल्यानंतर जेवणासाठी पैसे उरत नाहीत. महागाईमुळे जगणे कठीण झाले असून पेन्शन वाढवून निराधार वृद्धांना दिलासा द्यावा.”

read also :  https://ajinkyabharat.com/garibacha-cashew-ratshela-shengdana-mahag-mahashivaratri-purvi-darat-vikrami-vadh/

Related News