वय, उत्पन्न व डुप्लिकेट अर्जामुळे ५० लाखांवर महिलांना अपात्र ठरण्याची शक्यता
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहिण योजना’ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सध्या सुरू असलेल्या पात्रता पडताळणीत वयोमर्यादा, उत्पन्न मर्यादा आणि एकाच
कुटुंबातील एकापेक्षा अधिक अर्ज अशा कारणांमुळे लाखो महिला अपात्र ठरत आहेत.
राज्यात एकूण २.५९ कोटी महिलांनी अर्ज केला होता. त्यापैकी ४२ लाखांहून अधिक महिलांना आधीच अपात्र ठरवले असून,
आणखी ५० लाखांहून अधिक महिलांची अपात्रतेकडे वाटचाल असल्याचे संकेत मिळत आहेत.
सध्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत.
पुढील टप्प्यात आयकर खात्याकडून प्राप्त होणाऱ्या यादीवर आधारित उत्पन्न निकषांची छाननी होणार आहे.
त्यानुसार अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
सध्या दरमहा लागणारा निधी ३,८५५ कोटी रुपयांवरून ३,२२५ कोटींवर आला असून,
हा आकडा अजूनही खाली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
२१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिला अपात्र
एका कुटुंबातील एकाहून अधिक अर्ज अपात्र
उत्पन्न निकष तपासणीमुळे पुढील ५० लाख महिला अपात्र ठरू शकतात
सूत्रांचं मत:
या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला असून, आता संपूर्ण पारदर्शकतेसह
लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.