शेतकऱ्याची मदतीची मागणी
अकोट – अकोट तालुक्यातील दिवठाणा ग्रामपंचायत हद्दीतील खुदावंतपुर शिवारातील येथील गट क्र. २९ मधील शेतकरी रामदास शिवराम धर्मे यांच्या
शेतात रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते.
या पावसामुळे शेतकरी धर्मे यांच्या शेतातील विहीर कोसळून पूर्णपणे खचली. विहिरीजवळ असलेले मीटर घर व झोपडीसह संपूर्ण मलबा विहिरीत कोसळला.
तसेच विहिरीच्या आजूबाजूचा शेतजमिनीचा भाग देखील खचून विहिरीत पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेती व विहीर या दोन्हींचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
यासंदर्भात शेतकरी धर्मे यांनी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक व सरपंचांनी पंचनामा करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक व शेतीमालाचेही नुकसान झाल्याचे समजते.
Read also : https://ajinkyabharat.com/tua-naveen-scheme-fixed-influential-person-guidance/