अकोट तालुक्यातील रांभापुर फाटा ते अकोट या मार्गाचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे चालत असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सावरा फाटा येथे १२ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी, वाहनचालक, ऑटो युनियन सदस्य तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गाच्या दोन्ही बाजू खोदल्या असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच खोदकामावर पाणी टाकण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत होती, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती आणि रोडलगत शेतातील पीकावरही नुकसान होत होते.
आंदोलनाचा प्रभाव पाहून संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार घटनास्थळी आले. त्यांनी लेखी आश्वासन दिले की, खोदकामावर पाणी टाकण्याची टंकर संख्या वाढवली जाईल आणि कामाची गती लवकर वाढवली जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी प्रमाणात वाढ करण्याच्या मागणीलाही मान्यता देण्यात आली.
Related News
हा आंदोलन जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांच्या आदेशानुसार व अकोट विधानसभा अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. तालुकाध्यक्ष श्रियश शंकरराव चौधरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सुत्रसंचलन समर्थ आवारे यांनी तर प्रास्ताविक नागेश आग्रे यांनी केले, तर आभारप्रदर्शन मनीष तळोकार यांनी केले.
पोलीसही सकाळपासून चोख बंदोबस्तात तैनात होते. पक्षाचे युवा आमदार रोहीत पवार यांनी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला व तो मान्य करून घेतला.
या आंदोलनामुळे रांभापुर-अकोट मार्गाचे काम जलदगतीने आणि दर्जेदार करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. शेतकरी व स्थानिक रहिवाशांना वाहतुकीस आणि शेतमालाला होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
