मुंबई: महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना थेट फोन करून अशा वक्तव्यांपासून दूर राहण्याची सक्तीची सूचना दिली.
मुख्यमंत्र्यांचा फोन आणि सूचना
गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून स्पष्ट सांगितले की, अशा प्रकारची वक्तव्ये करू नका. मी त्यांच्या सूचनेचे पालन करणार आहे आणि यापुढे ज्या सूचना मला मिळतील, त्यांचे पालन मी करीन.”पडळकर यांनी या प्रसंगी शरद पवार यांच्यावरही टीका केली, “जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींवर खालच्या शब्दात टीका केली जात होती, तेव्हा मी त्यांना फोन केला का? तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत तयार केलेल्या AI व्हिडीओ संदर्भात पवारांनी मोदींना फोन करून निषेध व्यक्त केला का? हे कुणाला ठाऊक असेल तर मला सांगावे,” असे त्यांनी म्हटले.
शरद पवारांचा निषेध
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट फोन करून पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. पवारांनी सांगितले की, “ज्या खालच्या स्तरावर टीका होत आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा वाचाळवीरांना, खालच्या पद्धतीने टीका करणाऱ्यांना आवरा.”
पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्या वडिलांचा अपमान करत वादग्रस्त टीका केली होती. त्यांनी म्हटले:
“अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून.”
याप्रकरणी राज्यभरात अनेक ठिकाणी राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून, काही ठिकाणी आंदोलनही झाले आहेत.
राजकीय वातावरण
या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तातडीच्या चर्चेचा विषय बनले आहे. भाजप-राष्ट्रवादी संघर्षाचे चित्र स्पष्ट होत असून, पडळकर यांनी फडणवीसांच्या सूचनेचे पालन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत या प्रकरणाची राजकीय परिणामकारकता वाढू शकते.
read also : https://ajinkyabharat.com/bharatache-6-kheladu-missing/
