बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला
असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी मोठी ढगफुटी असून यावेळी झालेलं नुकसान अधिक व्यापक आहे.
रात्री 288 ते 300 मिमी पावसाची नोंद
21 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजल्यापासून तालुक्यात पावसाने रौद्र रूप धारण केलं. पहाटे 3 वाजेपर्यंत तब्बल 288 ते 300 मिमी पावसाची नोंद झाली.
या अतिवृष्टीमुळे लोणार शहरासह तालुक्यातील अनेक गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
तलाव, नद्या आणि नाल्यांनी किनाऱ्यावरून वाहायला सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली, पिकांचे थैमान
हिरडव, आरडव, वढव, जाफराबाद, दाभा, गुंधा, वेणी, मोहतखेड, वडगाव तेजन, खरामपूर, आजीसपूर,
पांग्रा, टिटवी, नांद्रा, दे, कुंडपाल, अंभोरा, भूमराळा, वझर आघाव, येवती, पारडा, कासारी, बिबखेड आदी गावांतील शेतकऱ्यांचे शेत जलमय झाले.
अनेक ठिकाणी शेती खरडून गेली असून मोटारपंप, तुषार संच, ठिबक सिंचनाच्या पाइप्स, सौलर प्लेट्स वाहून गेल्या आहेत.
शेतकरी संजय सरकटे (देऊळगाव कुंडपाल) म्हणाले, “महागडं बियाणं घेऊन सोयाबीनची पेरणी केली होती.
पिकं बहरात होती, पण आता हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कर्ज फेडायचं कसं? पोट भरायचं कसं? हे समजत नाहीये.”
ओव्हरफ्लोने सिंचन प्रकल्पाला भगदाड
देऊळगाव कुंडपाळ येथील सिंचन प्रकल्पाच्या भिंतीला ओव्हरफ्लोमुळे भगदाड पडले असून तिथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
या भागातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदी रुंदीकरणाचे फसवे आश्वासन आठवले
“नमामि गंगे अभियानांतर्गत नदी रुंदीकरण व खोलीकरणाचं केवळ उद्घाटन झालं, प्रत्यक्षात कोणतेच काम झाले नाही.
आज जर ती कामं झाली असती, तर नदीचं पाणी शेतात घुसलं नसतं,” असं मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज
शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदू मापारी यांनी म्हटलं आहे, “शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई द्यावी.
हे फक्त नैसर्गिक संकट नाही, तर दुर्लक्षाचा परिणाम आहे.”
प्रतिकूलतेतून सुटका – दोघांना वाचवण्यात यश
सरस्वती नदीच्या पलीकडे अडकलेले विकास विठ्ठल वाघमारे (वय 30) व विठ्ठल रामचंद्र
वाघमारे (वय 52) या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. याचवेळी दोन म्हशींनाही वाचवण्यात आलं.
निसर्गाने पुन्हा एकदा कोप दाखवत लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांची परीक्षा घेतली आहे.
आता शासनाने वेळ न घालवता तातडीने मदतीसाठी पुढे यायला हवे.
Read Also : https://ajinkyabharat.com/deougaon-kundapa-sinchen-problem-bhagadad/