मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात
आमरण उपोषणाला बसले आहेत.
या आंदोलनाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर हायकोर्टात सुनावणी झाली.
न्यायालयाने जरांगेंच्या प्रकृतीचा विचार करून ती खालावल्यास तत्काळ
रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच ठरवलेल्या अटी-शर्तींच्या अधीन राहून आंदोलनाला
परवानगी देण्याची मुभा दिली आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “जरांगेंच्या आंदोलनासाठी जी परवानगी देण्यात आली होती, त्याचे उल्लंघन झाले आहे.
रस्त्यावर जे प्रकार घडले, त्यावर न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
न्यायालयाने दिलेले निर्देश पाळणे सरकारला बंधनकारक आहे आणि सरकार त्याचे पालन करेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, आंदोलनावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मात्र, तोडगा असा हवा जो न्यायालयात टिकू शकेल.
“सरकार कुठलाही इगो धरत नाही, आडमुठेपणा करत नाही.
समोरून चर्चेला कोणी आले तर तोडगा निघेल,” असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांशी गैरवर्तन झाल्याच्या घटनेवरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
“पत्रकारांवर हल्ला महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही.
याचा निषेध झालाच पाहिजे,” असे फडणवीस म्हणाले.
पहिल्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती.
यावरून जरांगे यांनी सरकारवर उपाशी ठेवण्याचा आरोप केला होता.
मात्र, “सरकारनेच व्यापाऱ्यांना दुकाने उघडी ठेवण्याचे निर्देश दिले होते.
पोलिस संरक्षणही दिले होते. दुकाने मुद्दाम बंद ठेवण्यात आल्याचा आरोप चुकीचा आहे,”
असे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले.