नवी दिल्ली : ॲपल कंपनी आता संपूर्ण आयफोन १७ मालिकेचे उत्पादन भारतात करणार असून, या बनावटीचे फोन अमेरिकेतही पहिल्याच दिवशी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. भारतातल्या उत्पादनामुळे चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या ॲपलच्या धोरणाला हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.ॲपलने आतापर्यंत भारतात पाच आयफोन उत्पादन कारखाने सुरू केले असून त्यातील दोन अलीकडेच कार्यान्वित झाले आहेत. या बदलामागे व्यापारशुल्काचा धोका व अमेरिकन-चीन तणाव कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. केवळ या तिमाहीत कंपनीला १.१ अब्ज डॉलर्सचे शुल्क भरावे लागणार असल्याचा अंदाज आहे.
टाटा ग्रुपची मोठी भागीदारी
भारतीय टाटा समूह या विस्तारात मुख्य भागीदार ठरत असून, पुढील दोन वर्षांत भारतातील निम्मे आयफोन उत्पादन टाटाच्या कारखान्यांतून होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तामिळनाडूतील होसूर येथील प्रकल्प तसेच बेंगळुरू विमानतळाजवळील फॉक्सकॉनचे केंद्र उत्पादन वाढवण्यात मोठी भूमिका बजावत आहेत.भारतातून होणाऱ्या आयफोन निर्यातीला मोठी चालना मिळाली आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांतच ७.५ अब्ज डॉलर्सच्या मोबाईलची निर्यात झाली, जी मागील आर्थिक वर्षात झालेल्या एकूण १७ अब्ज डॉलर्स निर्यातीच्या जवळपास निम्मी आहे. मार्च २०२५ अखेरच्या १२ महिन्यांत भारतात तब्बल २२ अब्ज डॉलर्सचे आयफोन एकत्रित करण्यात आले असून, हे जागतिक उत्पादनाच्या २० टक्क्यांहून अधिक आहे.कोविड काळातील चीनमधील लॉकडाऊन व त्यानंतरचे भू-राजकीय तणाव या सर्व पार्श्वभूमीवर ॲपलने भारतात उत्पादनाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेसह जागतिक बाजारासाठी स्थिर पुरवठा सुनिश्चित होईल, असे मानले जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/polis-thakya-ghadla-bhavnik-moment/
