मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना राज्य सरकारने मान्यता दिली असून
उपसमितीने तयार केलेल्या शिफारशींवर अभ्यासकांनीही शिक्कामोर्तब केलं आहे.
सरकारने तातडीने जीआर काढण्याची तयारी दाखवली असून,
“तो जीआर निघाला की एका तासात मुंबई रिकामी करतो,” असा शब्द मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मराठा उपसमितीची बैठक
गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात जरांगे हे आंदोलन करत आहेत.
आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मराठा उपसमितीने जरांगे यांची भेट घेतली.
त्यावेळी उपसमितीने तयार केलेला अंतिम मसुदा त्यांच्या समोर ठेवण्यात आला.
उपसमितीच्या शिफारशी
हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी
गाव, कुळ व नात्यातील लोकांची चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणे
सातारा गॅझेटवरील अभ्यास पूर्ण करून एका महिन्यात मान्यता
आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेणे (सप्टेंबर अखेरपर्यंत)
शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी
आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना १५ कोटींची मदत एका आठवड्यात
अभ्यासकांची खात्री
उपसमितीच्या शिफारशींवर मराठा अभ्यासक आणि वकिलांनी चर्चा केली.
“या शिफारशी योग्य आहेत आणि त्यावर जीआर काढला जाऊ शकतो,”
असा निष्कर्ष त्यांनी दिला. त्यामुळे सरकारने जीआरची प्रक्रिया सुरू केली असल्याचं समजतं.
जरांगेंचा ठाम इशारा
“सरकारने जीआर काढावा, त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.
पण जीआर काढताच एका तासात मुंबई रिकामी करतो,”
असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
आझाद मैदानात झालेल्या मोठ्या गर्दीमुळे गणेशोत्सवात मुंबईच्या गतीला काहीसा ब्रेक बसला होता.
सरकारकडून जीआर निघण्याची औपचारिक घोषणा आता केव्हाही होऊ शकते.
Read also : https://ajinkyabharat.com/afghanistan-fierce-earthquake-400-thar-2500-wounds/