मुंबई – दादर कबुतरखान्यात कबुतरांना खाद्य देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कायमस्वरूपी
निर्बंध घातल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयाविरोधात आता जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट इशारा देत,
“गरज पडल्यास धर्मरक्षणासाठी शस्त्रही हाती घेऊ” अशी स्पष्ट चेतावणी दिली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतरही काही जैन बांधवांनी कबुतरांना अन्न टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
या पार्श्वभूमीवर जैन समाजाने १३ ऑगस्टपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
“कबुतरं मरता कामा नयेत, आम्ही शांततेत सत्याग्रह करणार आहोत.
पण आमच्या धर्माविरोधात कुणी गेलं तर आम्ही कोर्टालाही मानणार नाही,” असे निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “आम्ही भारताचं संविधान आणि कोर्टाचा मान राखतो. पण धर्मरक्षणासाठी गरज पडली तर शस्त्रही उचलू.
देशभरातील १० लाख जैन बांधव मुंबईत आंदोलनासाठी येतील.
मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कुठलाही जीव मरता कामा नये, हे आमच्या धर्मात लिहिलं आहे.
मग कबुतरांना खाद्य देणं का थांबवायचं?” असा सवाल त्यांनी केला.
येत्या पर्युषण पर्वानंतर आंदोलनाचा निर्णय अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मनसे आणि ठाकरे गट यांची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
वादाच्या या नव्या टप्प्यामुळे दादर परिसरातील वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Read also :https://ajinkyabharat.com/chromebookryl-steam-gaming-service-shut-down-millions-of-gamers/