विहिरीची पाणी पातळी वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत
दानापूर (वा) नंदकिशोर नागपुरे
पावसाळा सुरू होऊन दोन ते अडीच महिने झाले; मात्र अद्यापही जोरदार
पाऊस न पडल्याने दानापूरसह परिसरातील नदी -नाले अद्यापही कोरडे पडले आहेत.
त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.
तेल्हारा तालुक्यातील काही शेती कोरडवाहू आहे तर काही बागायती आहे.
परिसरात भाजीपालावर्गीय व फळबाग पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात;
मात्र दोन ते अडीच महिने उलटल्यावर सुद्धा समाधानकारक पाऊस पडला नाही.
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे;
मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही, त्यामुळे नदी-नाले अद्यापही कोरडी पडली आहेत.
त्यामुळे रिपरिप पावसाने फक्त पिकांना जीवनदान मिळत आहे.
तर परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे,
त्यामुळे यावेळी पीक निघून जाईल; मात्र भविष्यात काय?
येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला नाही तर हंगामी पिके
शेतकऱ्याच्या हातातून जातात की काय ? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
उन्हाळ्यात भुईमूग, भाजीपाला व फळबागांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते;
मात्र येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास या पिकांना फटका बसणार आहे.
वान नदी कोरडीच
सातपुड्याच्या कुशीतून वाहणारी वान नदी एके काळी बाराही मास वाहत होती;
मात्र याच वान नदीवर वान धरण बांधण्यात आल्याने पाणी आता धरणात साठवले जाते;
मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या बाहेरून वाहणारी आडनदी हीसुद्धा वान नदीला येऊन मिळते.
मात्र आडनदी वाहत नसल्याने वान नदीच्या पोटातून अजुन एक थेंब सुध्दा बाहेर पडला नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/actress-huma-qureshiichya-chulat-bhavacha-khoon/